एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २० : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान नसल्याचे तपासणीत आढळेल, त्यांना नोटीस बजावून एक महिन्याच्या कालावधीत मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात येत आहे. या मुदतीत मराठी भाषेचे ज्ञान आत्मसात न केल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई महानगर क्षेत्रात झालेल्या तपासणीत ३ हजार ९९५ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आले असून, या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यातील उर्वरित आकडेवारीनुसार आतापर्यंत ४ हजार २२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
“महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नाही, तर प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित बाब आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. तपासणीदरम्यान चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान तपासले जाईल. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार असली, तरी त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात विहित मुदतीनंतर बॅज निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
०००
