सोळशी प्रकल्पाबाबतच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घ्या – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. २१ : सोळशी प्रकल्पांतर्गत सुमारे एक किलोमीटर लांबीच्या आणि साडेपाच टीएमसी क्षमता असलेल्या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या मनातील विविध शंका आणि अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित केली जावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.
पालकमंत्री देसाई यांनी सोळशी प्रकल्पाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. या आढावा बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखली पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पाच्या कामामुळे संवरवाडी परिसरातील पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेऊन फेरसर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी या सर्व प्रक्रियेचा सतत पाठपुरावा करावा, असे आदेशही पालकमंत्री देसाई यांनी दिले.
फेरसर्वेक्षण आणि पुनर्वसनाची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने संरक्षण भिंत उभारण्यात यावी. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करून ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.
०००
