विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून उपस्थितांचे मन भारावले – विश्वास हरी
तरडी (ता. पारोळा) | प्रतिनिधी , पारोळा तालुक्यातील तरडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनेक वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या कला-कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह, आत्मविश्वास व दर्जेदार सादरीकरण पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले.या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच कस्तुराबाई बल्लू पवार होत्या, तर उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास हरी पाटील हे उपस्थित होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत मनोहर पाटील, केंद्रप्रमुख श्रीमती करुणा बन्सीलाल देवकर (शिरसोदे केंद्र), केंद्रप्रमुख श्री. गिरीश रामचंद्र वाणी (उंदीरखेडे), शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद बल्लू पवार, भाऊसाहेब सुरेश भिल्ल, भाईदास नथू सरदार, सुनंदा बारकू भील व मीराबाई शोभा वंजारी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.उद्घाटक श्री. विश्वास हरी पाटील यांनी आपल्या मनोगतात तरडी जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्षांनंतर स्नेहसंमेलनाचे आयोजन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता असून, अभ्यासाबरोबरच कला, नृत्य, नाट्य व गायन अशा विविध क्षेत्रात ते उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांनी त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक व जीवन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणा सोबत पोषण, आरोग्य व संस्कार यांचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला तरडी जिल्हा परिषद शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती देवयानी निळकंठ बडगुजर यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा दत्तात्रय पाटील व अंकुश भारमल पवार यांनी प्रभावीपणे केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक श्रावण संतोष माळी, हिम्मत बाबुलाल पाटील तसेच संपूर्ण ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. दीर्घ कालावधीनंतर साजऱ्या झालेल्या या स्नेहसंमेलनामुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरणात नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
