श्रीनाथजी नगर येथील रोहित्राचे काम पूर्ण आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शब्दपूर्तीला पुन्हा एकदा यश…
पारोळा – शहरातील श्रीनाथजी नगर परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रोहित्राचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून आज या कामाला प्रत्यक्ष पूर्णत्व प्राप्त झाले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीज समस्येतून मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्रीनाथजी नगर परिसरात गेल्या अनेक दशकांपासून कमी दाबाने वीज मिळणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे तसेच विद्यमान रोहित्रावर वाढलेला अतिरिक्त भार यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. घरगुती वापरासोबतच व्यावसायिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या समस्येचा फटका बसत होता. अनेक वेळा नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी व निवेदने दिली होती, मात्र प्रश्न कायम प्रलंबित राहिला होता.या गंभीर समस्येची दखल घेत मागील नगरपरिषद निवडणुकीदरम्यान श्रीनाथजी नगर येथे आयोजित प्रचार सभेत आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी नागरिकांना स्वतंत्र रोहित्र बसवून देण्याचे ठोस आश्वासन दिले होते. निवडणूक संपल्यानंतर त्यांनी या कामासाठी महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विवेक पाटील यांनी देखील या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष केला. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क, प्रशासनाकडे पाठपुरावा, नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच आवश्यकतेनुसार आंदोलनाचा इशारा देत हा विषय प्राधान्याने लावून धरला. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत श्रीनाथजी नगर येथे रोहित्र मंजूर करण्यात आले.महावितरण विभागामार्फत आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून रोहित्र उभारणीचे काम हाती घेण्यात आले आणि आज हे काम पूर्णत्वास आले. नवीन रोहित्र कार्यान्वित झाल्यामुळे परिसरातील वीज दाब पुरेसा राहणार असून वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येत मोठी घट होणार आहे.यावेळी परिसरातील नागरिक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आमदार ॲड. अमोलदादा पाटील व नगरसेवक विवेक पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानत “शब्द दिला आणि तो पूर्ण करून दाखवला,” अशी भावना व्यक्त केली.तसेच माय-बाप जनतेने आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी यापुढे देखील विकासकामांना प्राधान्य देत जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे नगरसेवक विवेक पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांचे विशेष आभार देखील व्यक्त केले.
