पारोळा – प्रतिनिधी, शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवारच्या वीज खंडित प्रकारामुळे नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला असून विविध सामाजिक, व्यापारी व वैद्यकीय संघटनांनी विद्युत विभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भर उन्हाळ्यात दिवस-रात्र वेळ न पाहता होणाऱ्या ट्रिपिंगमुळे संपूर्ण शहर अक्षरशः हैराण झाले आहे. व्यापारी, हॉस्पिटल सेवा, आईस्क्रीम व रसवंती व्यवसाय, झेरॉक्स सेंटर, शासकीय कार्यालये तसेच नगरपालिका पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर याचा गंभीर परिणाम होत असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.विशेष म्हणजे, या सततच्या समस्येबाबत नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडत असतानाही विद्युत विभागाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियोजनाचा पूर्ण अभाव, ढिसाळ तांत्रिक कामकाज आणि जबाबदार अभियंत्यांची टाळाटाळ यामुळे नागरिक आणि विद्युत विभाग यांच्यात रोजच वादाच्या घटना घडत असल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर डॉक्टर असोसिएशन, छावा संघटना, व्यापारी महासंघ, नमामि फाउंडेशन, वीर सावरकर विचार मंच – विद्यानगर व बालाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने उपकार्यकारी अभियंता सहारे यांना निवेदन देण्यात आले.“प्रत्येक वर्षी जनतेचा रोष सहन करूनही विभागाने आजपर्यंत कोणतीही ठोस सुधारणा केली नाही. मात्र बिल वसुली आणि मर्जीतील लोकांना ठेके देण्यात विभाग अत्यंत तत्पर दिसतो,” असा संतप्त आरोप यावेळी करण्यात आला. “आज दिलेले निवेदन हे शांततेच्या मार्गाने असले तरी भविष्यात परिस्थिती न सुधारल्यास नागरिकांचा उद्रेक थांबविणे कठीण जाईल,” असा इशाराही संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला.डॉ. सचिन करोडपती (अध्यक्ष – डॉक्टर असोसिएशन, पारोळा) म्हणाले, “सर्व हॉस्पिटल्समध्ये इन्व्हर्टर किंवा पर्यायी यंत्रणा असल्या तरी वैद्यकीय तपासणी किंवा उपचार सुरू असताना वारंवार होणारे वीज खंडित प्रकार अत्यंत धोकादायक आहेत. विशेषतः गंभीर रुग्ण आणि नवजात बालकांसाठी ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते.”छावा संघटनेचे गणेश पाटील यांनीही संताप व्यक्त करताना सांगितले, “रात्र-दिवस वेळ न पाहता होणारी ट्रिपिंग ही वृद्ध, लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा त्रास बनली आहे. वारंवारच्या व्होल्टेज समस्येमुळे अनेकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होत आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर नुकसानभरपाई देण्याची तयारी विद्युत विभागाने ठेवावी. आज आम्ही शांततेने निवेदन दिले आहे; पण उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन उभे राहील.”सामाजिक कार्यकर्ते राहुल निकम (नमामि फाउंडेशन) यांनी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “वारंवार ट्रिपिंगचे नेमके कारण काय? गेल्या दोन वर्षांत ४ ते ८ तासांचे मोठमोठे शटडाउन घेऊनही सामान्य जनतेला फायदा काय झाला? दिवसातून २० वेळा वीज खंडित होणे ही विभागासाठी लाजिरवाणी बाब नाही का? तक्रारी करूनही ग्राहकांच्या मागणीनुसार ठोस उपाययोजना का होत नाहीत? अधिकाऱ्यांवर शासनाचा वचक नसणे की कामाबद्दलची उदासीनता — नेमकं कारण काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच “साधे निवेदन स्वीकारण्यासाठीही जबाबदार अभियंते टाळाटाळ करत असतील तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर?” असा संतप्त प्रश्नही त्यांनी विचारला.यावेळी वीर सावरकर विचार मंचाचे सदस्य प्रसाद पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, उपअभियंता गवारे यांनी “समाजातील सर्व स्तरांतून आलेल्या निवेदनाची निश्चितच दखल घेतली जाईल व येणाऱ्या काळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू,” असे सांगितले. मात्र नागरिकांच्या मते आता केवळ आश्वासनांनी काम भागणार नसून ठोस कृती दिसणे गरजेचे आहे.
