पारोळा नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे उंदीरखेडे रोडवर अपघातांची मालिका; नागरिकांमध्ये संताप
पारोळा, प्रतिनिधी : पारोळा शहरातून उंदीरखेडे रोडकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे या मार्गावर दररोज अपघात घडत असून, पारोळा नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबरी रस्ता आणि कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची उपाययोजना नसल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काल या ठिकाणी एका शासकीय कर्मचाऱ्यासह बोहरा शाळेत जाणारी एक विद्यार्थिनी अपघातात जखमी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा १४ वर्षीय मुलगा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला व मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले.सलग घडणाऱ्या अपघातांनंतरही संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती, गतीरोधक उभारणी, इशारा फलक व अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.नागरिकांनी तात्काळ उंदीरखेडे रोडची दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसवावेत, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.या गंभीर प्रकाराची जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे.
