पारोळा : प्रतिनिधी, आषाढी एकादशीचे औचित्य साधून टायगर इंटरनॅशनल स्कूल, पारोळा येथे भक्तिमय वातावरणात दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्ले ग्रुप ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई तसेच अन्य संतांच्या जयघोषात दिंडी काढून वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडवले.कार्यक्रमाची सुरुवात पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दादासाहेब अमोल चिमणराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष-रविंद्र पाटील व संचालिका – रूपाली पाटील यांच्या शुभहस्ते विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करून झाली. त्यानंतर निमंत्रित भजन-कीर्तन मंडळींनी अभंग, हरिपाठ व कीर्तन सादर करून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला.यावेळी आमदार दादासाहेब अमोल चिमणराव पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि सुसंस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.प्राचार्य पी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व पटवून दिले. संतांच्या विचारांचे अनुकरण करून शिस्त, सेवा, नम्रता, प्रामाणिकपणा आणि सुसंस्कार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.या सोहळ्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई तसेच इतर संतांच्या वेशभूषेत साकारलेल्या भूमिका सर्वांचे विशेष आकर्षण ठरल्या. त्यांच्या निरागस सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. टाळ, मृदुंग, भगवे पताके आणि पालखीसह विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करत उत्साहपूर्ण दिंडी काढली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत साहित्य आणि भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा प्रत्यक्ष अनुभवता आला.या प्रसंगी प्राचार्य पी. एस. पाटील, उपप्राचार्य अजीम शेख, उपप्राचार्या कविता सूर्यवंशी, स्कूल समन्वयक नम्रता बेडीस्कर, विभागप्रमुख वृषाली पाटील, काजल सिंधी, लिपिक श्रीकांत खैरनार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत भक्तिभावपूर्ण, उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
