नवीन पाच पोलीस चौकींमुळे नागपुरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0 2





नागपूर, दि. २६ : नागपुरच्या वाढत्या विस्ताराला लक्षात घेऊन सुरक्षितता व सुरक्षा नियोजनाच्या दृष्टीने काही भागांसाठी पोलीस चौक्यांची आवश्यकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेले निर्देश लक्षात घेऊन शहरातील पाच ठिकाणी पोलीस चौकींची उपलब्धता करण्यात आली आहे. यामुळे निश्चितच नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासह अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज त्यांच्या हस्ते या पाच पोलीस चौकीचे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेद्र दाभाडे, शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त  लोहित मतानी, दिपक अग्रवाल व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. गणेश नगर कोराडी, कापसी, जामठा, गोंडखैरी, उमरगाव या ठिकाणी  पोलीस चौकी साकारण्यात आल्या आहेत.

पोलीस विभागाच्या यु-टर्न ऑपरेशनमुळे वाहतुक सुरक्षित होणार असून अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. नागपूर शहर आता आंतराष्ट्रीय शहर म्हणून नावारुपास आले आहे. सुरक्षीत नागपूरसाठी युवकांचा सहभाग आवश्यक असून त्यासाठी पोलीस विभागाने युवकांना सोबत घेऊन सुरक्षीत नागपूर उपक्रमाला लोकसहभागाची जोड द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी केले. यु- टर्न ऑपरेशनमुळे कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्यास मोठा हातभार लागणार असून नागरिकांसाठी वाहतूक सोईची होईल, असे  त्यांनी सांगितले.

00000

 







Leave A Reply

Your email address will not be published.