नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार

0 4


नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : दिंडोरी येथे नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश नगरपालिकेला दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

दिंडोरी येथे काल रात्री विहिरीत कार कोसळून ६ शालेय विद्यार्थासह नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर मंत्री श्री. महाजन यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, नऊ जणांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या घटनेची सखोल चौकशीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार ते चौकशी करून अहवाल सादर करतील. या अपघातप्रकरणी संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला असून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

०००००

 

Leave A Reply

Your email address will not be published.