भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान म्हणजे योग – केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल

0 0


मुंबई, दि. २१ : योग भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान आहे. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून संपूर्ण जीवनशैली आहे. प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित योग कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, खासदार डॉ. निशिकांत दुबे, खासदार रवी किशन, मुंबई प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू, उपाध्यक्ष आदेश तितरमारे, अभिनेत्री ईशा देओल आणि नीतू चंद्रा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य, भावनिक संतुलन आणि तणावमुक्त जीवन साध्य होते. ‘वन अर्थ, वन हेल्थ’ या संकल्पनेला योग अधिक बळकट करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून आज जगभरातील कोट्यवधी लोक निरोगी जीवनासाठी योगाचा स्वीकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान म्हणाले, ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. योगाचा शोध भारतीय ऋषी-मुनींनी हजारो वर्षांपूर्वी लावला असून संपूर्ण जग त्याचा स्वीकार करत आहे. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे  दिवसातील काही वेळ स्वतःच्या शरीरासाठी आणि मनासाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे.

कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे प्रक्षेपणही दाखविण्यात आले.

०००००

Leave A Reply

Your email address will not be published.