राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २३ : पोलीस दलामध्ये कार्यरत असताना हिमांशू रॉय यांनी राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात केलेले कार्य सर्वपरिचित आहे. हिमांशू रॉय फाउंडेशनच्या वतीने संशोधित केलेले कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळातील निदानासाठी ‘हिमांशू रॉय कॅन्सर डिटेक्शन किट‘ कर्करोगातील उपचाराकरिता निश्चितच महत्त्वाचे ठरत आहे. हे कार्य त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या ‘हिमांशू रॉय लिगसी‘ पुरस्कारामुळे समाजाच्या सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरवच होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित ‘द हिमांशू रॉय लिगसी पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हिमांशू राय फाउंडेशनच्या संस्थापक भावना रॉय उपस्थित होत्या.

हिमांशू रॉय यांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिमांशू रॉय यांनी कर्करोगाशी लढा दिला. मात्र तो अयशस्वी ठरला. मुंबईतील गुन्हेगारी मोडीत काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबईतील लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटाचा तपास आणि महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांनी केलेले कार्य राष्ट्र कधी विसरू शकणार नाही. प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपल्या कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
कर्करोगातील लवकर निदानासाठी प्रतिष्ठानने संशोधित केलेले किट कर्करोगातील उपचारांमध्ये वरदान ठरत आहे. हिमांशू रॉय प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रात 20 हजार लोकांना हिमांशू रॉय कर्करोग निदान कीटच्या माध्यमातून कर्करोगाच्या लवकर निदानासाठी लाभ मिळणार आहे. हे प्रशंसनीय कार्य असून यासाठी महाराष्ट्र शासनही प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य करेल. राज्य शासनाने कर्करोगाविरुद्ध लढाईसाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. लवकर निदान आणि माफक उपचार देण्याचे कार्य करण्यात येत आहे. या मोहिमेचाच भाग समजून प्रतिष्ठानच्या कार्याला जोडून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गंधर्व संगीत महाविद्यालय आणि डॉ. अश्विनी भिडे – देशपांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वैद्यकीय क्षेत्रात डॉ. झरीर उदवाडिया आणि डॉ. शेखर भोजराज यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील पुरस्कार मरणोपरांत शहीद तुकाराम गोपाल ओंबळे यांना त्यांच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाब याला जिवंत पकडण्याच्या अतुलनीय कार्यासाठी देण्यात आला. त्यांची मुलगी वंदना ओंबळे – पटणी यांनी पुरस्कार स्वीकारला.
हिमांशू रॉय फाउंडेशनच्या रुग्ण सेवेत कार्यरत असलेल्या अमिताभ शहा, ऋषभ शहा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मनोरंजन, वैद्यकीय, बांधकाम, प्रशासन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
००००
निलेश तायडे/विसंअ
