दर्जेदार शिक्षणासाठी प्राथमिक शाळांच्या सुधारणांवर भर – शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पालकांनी स्वदेशी आहारास प्राधान्य द्यावे – कांचन गडकरी
नागपूर,दि. ३०: राज्यातील प्राथमिक शैक्षणिक सुविधा भक्कम होण्यासाठी शासनातर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. काही वर्षांपासून बी.एड व डी. एडसाठी अतिशय गुणवत्तापूर्ण विद्यार्थी येत असून स्वाभाविकच यातील नवीन शिक्षक हे तल्लख व नव्या युगाशी, ज्ञानशाखांशी पारंगत व साधर्म्य साधणारे आहेत. जिथे शिक्षक कल्पक व अभ्यासू असतात तिथे स्वाभाविकच चांगले परिवर्तन आपण अनुभवतो. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून या शिक्षकांच्या हातून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असल्याने आता शासकीय शाळा या गुणवत्तेच्या पातळीवर निवडक खाजगी संस्थांप्रमाणे नावारुपास आल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

उन्हाळी सुट्टयानंतर आज शाळेला सुरुवात झाली. या सेवा प्रवेशोत्सवानिमित्त सेवासदन हायस्कुल येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत, शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर विभागात सुमारे 23 हजार शाळा या विद्यार्थ्यांना शिस्त आणि ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी सज्ज झाल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले.
शिक्षणासाठी आरोग्याचा तेवढाच जवळचा संबंध आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभासक्रमाच्या अभ्यासासमवेत आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पालकांनी यासाठी पुढाकार घेऊन फास्टफुड ऐवजी आपल्या अस्सल स्वदेशी आहार शैलीला जपून मुलांना तसे संस्कार द्यावेत, असे आवाहन सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या डिजीटल ज्ञानरथचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले कौतुक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात एआय, पीआय लॅब आणि तंत्रज्ञान आधारीत शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान याबाबतचा आत्मविश्वास पोहचावा याउद्देशाने जिल्हा परिषदेने तयार केलेल्या एआय बस ज्ञानरथाची पाहणी त्यांनी केली. या ज्ञानरथाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या व ग्रामीण भागात असलेल्या विविध संस्थांच्या शाळेमधील मुलांमध्ये डिजीटलबाबत आत्मविश्वास वाढेल व तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण होईल असा विश्वास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.
00000
