कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा (ऑफ-शोअर ट्रफ) सक्रिय असून, मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण परिसरातून पसरली आहे. या हवामान प्रणालीमुळे राज्यातील अनेक भागांत ६ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ते बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज असून, विदर्भात जवळपास सर्वच भागांत व्यापक पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २ आणि ३ जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, इतर दिवशी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव दत्तात्रय कदम यांनी कळवले आहे.
२ ते ४ जुलै दरम्यान कोकणातील काही भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच २ आणि ३ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ४ ते ६ जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. याशिवाय ३० जून ते ४ जुलै या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, शहरी भागातील रस्ते जलमय होणे, तसेच घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक व रस्त्यांची अद्ययावत माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शेतीविषयक सल्ला देताना, भातशेती व भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमधील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसाच्या काळात जनावरांना सुरक्षित गोठ्यात ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला पशुपालकांना देण्यात आला आहे.
00000
किरण वाघ/विसंअ
