आरावी व श्रीवर्धन बीच विकासकामांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

0 0


मुंबई, दि. २: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळावी आणि समुद्रकिनाऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी मौजे आरावी (ता. श्रीवर्धन) येथील बीच सुशोभीकरण; तसेच श्रीवर्धन बीचला ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी सुरू असलेल्या विकासकामांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आढावा घेतला. संबंधित यंत्रणांनी सर्व विकासकामे दर्जेदार, वेळेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्ण करून पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मंत्री तटकरे यांच्या दालनात यासंदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात त्या बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत आरावी बीच परिसरातील सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, पर्यटकांसाठी शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पादचारी सुविधा, प्रकाश व्यवस्था तसेच इतर आवश्यक विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

श्रीवर्धन बीचच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासंदर्भातील कामांचा आढावा घेताना मंत्री तटकरे यांनी सांगितले. समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, सुरक्षा व्यवस्था, लाइफगार्ड सुविधा तसेच पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करु देण्यात याव्यात.

सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून निर्धारित कालावधीत कामे पूर्ण करावीत. पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटन विकासाला प्राधान्य देत आरावी व श्रीवर्धन हे समुद्रकिनारे राज्यातील आदर्श पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

000000

एकनाथ पोवार/स.सं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.