वारीप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आस्था; जागतिक पटलावर पोहोचणार आषाढी वारीचा आध्यात्मिक वारसा!

0 1


महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती आणि आषाढी वारीचा अलौकिक सोहळा ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वारशाची ओळख आहे. वारी ही केवळ लाखो पावलांची यात्रा नसून मानवता, समता, बंधुभाव आणि सामूहिकतेचा संदेश देणारा महाराष्ट्राचा निर्मळ झरा आहे. या परंपरेविषयी असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धा, संवेदनशीलता आणि बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली, ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘पंढरपूरची वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाच्या प्रीमियर शोच्या निमित्ताने.

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असते, तेव्हा मंत्रालयापासून विधानभवनापर्यंत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. निर्णय, चर्चा, बैठका आणि राज्यकारभाराच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून एखाद्या कार्यक्रमासाठी वेळ काढणे सहज शक्य नसते. मात्र, जेव्हा विषय पंढरपूरच्या वारीचा आणि संतांच्या विचारांचा असतो, तेव्हा वेळ हा अडथळा राहत नाही. राज्याच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आयनॉक्स चित्रपटगृहात उपस्थित राहून हा प्रीमियर शो पाहिला. ही उपस्थिती केवळ एका औपचारिक कार्यक्रमासाठी नव्हती, तर महाराष्ट्राच्या संतपरंपरेला आणि विठ्ठलभक्तीला मुख्यमंत्र्यांनी दिलेला तो सर्वोच्च सन्मान होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारीशी असलेले नाते केवळ कौतुकापुरते मर्यादित नाही, तर ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करणारे लोकनेते आहेत. दरवर्षी लाखो वारकरी सुरक्षित, सुसूत्र आणि आनंददायी वातावरणात वारी पूर्ण करू शकतील, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. वारी मार्गावरील शुद्ध पिण्याचे पाणी, विशेष आरोग्य सुविधा, स्वच्छता, चोख सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवा यांसारख्या बाबींवर त्यांनी नेहमीच विशेष भर दिला आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा असल्याची भावना त्यांच्या कृतीतून सातत्याने दिसून येते.

‘पंढरपूरची वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा माहितीपट केवळ दृश्य माध्यमातील कलाकृती नाही, तर महाराष्ट्राच्या अध्यात्माचा एक प्रभावी दस्तऐवज आहे. मोठ्या पडद्यावर टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांचा गजर, दिंड्यांचा उत्साह आणि लाखो वारकऱ्यांच्या मुखी असलेले “ज्ञानोबा-तुकाराम”चे सूर जेव्हा गुंजले, तेव्हा प्रेक्षकांना जणू प्रत्यक्ष वारीत चालत असल्याची अनुभूती आली. चित्रपटगृह काही क्षणांसाठी पंढरपूरच्या वारीतच रूपांतरित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या विशेष उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, आषाढी वारीचा हा अद्वितीय सांस्कृतिक वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने २२ मिनिटांचा इंग्रजी माहितीपट तयार करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला समता व भक्तीचा संदेश आता भाषेच्या मर्यादा ओलांडून जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची ही अमूल्य परंपरा मांडण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

राजकीय नेतृत्वाची खरी ओळख केवळ त्यांनी घेतलेल्या प्रशासकीय निर्णयांवरून होत नाही, तर आपल्या मातीशी आणि लोकसंस्कृतीशी असलेल्या त्यांच्या घट्ट नात्यातून होते. अधिवेशनाच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रीमियर शोला लावलेली हजेरी हेच दर्शवते की, वारी हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा आणि अस्मितेचा केंद्रबिंदू आहे. राज्याचा हा गौरवशाली इतिहास आणि भक्तीचा भुई जगासमोर अधिक प्रभावीपणे यावा, हाच मुख्यमंत्र्यांच्या या उपस्थितीमागील मूळ उद्देश आणि प्रेरणा होती.

0000

वर्षा फडके – आंधळे

उपसंचालक (वृत्त)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.