‘पंढरीची वारी’ माहितीपटातून महाराष्ट्राच्या चैतन्यमय सांस्कृतिक वारशाचे जागतिक पटलावर दर्शन

0 0


मुंबई, दि. १० : जातपात- धर्मापलीकडे मानवतेची पताका खांद्यावर घेत… डोळ्यांत विठ्ठल माऊलीच्या भेटीची आर्त ओढ साठवत… टाळ- मृदुंगाच्या गजरात… देहभान हरपत शेकडो मैल चालूनही अलौकिक चैतन्याची प्रचिती अनुभवत आणि माणसा- माणसांत साक्षात विठूरायाचे दर्शन घडविणाऱ्या पंढरीच्या वारीचा विस्मयकारक, अद्‌भूत आणि भव्य प्रवास आता रुपेरी पडद्यावर एका देखण्या माहितीपटाच्या माध्यमातून अवतरला आहे. ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष खेळ (प्रीमियर शो) झाला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनीने या माहितीपटाची निर्मिती केली आहे. त्याचा प्रीमियर शो येथील आयनॉक्स चित्रपटगृहात काल रात्री झाला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव समृद्धी अनगोळकर, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक वर्षा आंधळे आदी या वेळी उपस्थित होते.

‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा माहितीपट 22 मिनिटांचा आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलगू, बंगाली, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये डबिंग करुन त्याचे डिस्कव्हरीच्या विविध उपग्रह वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात येत आहे. त्यात डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, अ‍ॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (आयडी), डिस्कव्हरी सायन्स आणि डिस्कव्हरी टर्बो अशा नऊ वाहिन्यांचा समावेश आहे.

‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे डिजिटल युगातले एक सदस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. वारीतील समतेची पाऊलवाट अत्यंत भक्तिभावाने पडद्यावर प्रकट होते. चिखल- माती तुडवत, अबीर-गुलालाची उधळण, रिंगण सोहळ्यात धावणारे अश्‍व आणि चंद्रभागेच्या तीरावरील अथांग भक्तिसागर… प्रत्येक फ्रेममधून जणू विठ्ठलनामाचा गजर थेट हृदयाचा ठाव घेतो.

महाराष्ट्रात शतकानुशतके चालत आलेल्या या परंपरेचे अंतरंग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. वारीत सहभागी होणाऱ्या आबालवृद्धांचा निस्सीम विश्‍वास आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या मंत्राची ताकद काय असते, याचे जिवंत चित्रण यात पाहायला मिळते. वारीतल्या या लालित्यपूर्ण प्रवासाला माहितीपटाच्या रूपामध्ये बांधून महाराष्ट्राचे हे सांस्कृतिक वैभव जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे एक स्तुत्य पाऊल या निमित्ताने उचलले गेले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुक केले आहे.

सांस्कृतिक संचित जगासमोर: मुख्यमंत्री फडणवीस

देशातल्या भक्ती मार्गातली वारी ही सर्वात प्राचीन परंपरा आहे, ती सर्वांना मोठी ऊर्जा देते. धर्म – जात, भाषा, गरीब – श्रीमंत, असा कुठलाही भेद न करता सर्वांना विठूरायाच्या रंगी रंगविणारी माऊलीची ही वारी महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. ही परंपरा आणि संचित जगासमोर आले पाहिजे, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनीच्या माध्यमातून नेत्रदीपक माहितीपट तयार करण्यात आला आहे. वारीचे उद्दिष्ट काय? त्या मागची प्रेरणा काय? त्यात सहभागी होणाऱ्यांच्या मनातले विचार काय? वारीची पद्धती काय? हा सगळ्यांचा उलगडा या माहितीपटातून होतो. आपण विश्वात्मकेसाठी देवाला साकडे घालणारे लोक आहोत, याची प्रचिती या माहितीपटातून येते, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी काढले.

००००

 

जगदीश मोरे/ व.स.सं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.