गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आवाहन

0 0


नाशिक, दि. २३ जुलै (जिमाका) : गंगापूर धरण व परिसरात कालपासून पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्या- टप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. आज सायंकाळपर्यंत गोदावरी नदीत पाणी सोडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम, पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी आज दुपारी होळकर पुलावरून रामकुंड व गोदावरी नदी परिसरातील पुराची पाहणी केली. त्यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलिस, मनपा, जिल्हा परिषद प्रशासनाला दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आवश्यक तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता नागरिकांनी नदी काठावर गर्दी करू नये, असेही आवाहन विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले आहे.

००००००

Leave A Reply

Your email address will not be published.