उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ

0 0


पुणे, दि. २४: बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हान असून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित अजितदादा पवार कृषी समृद्धी योजनेचा शुभारंभ केला आहे. कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेती ही क्रांतिकारक चळवळ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा शुभारंभ, शेतकरी मेळावा व आदर्श शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप वळसे पाटील, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त संजय कोलते, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित शेतीसाठी ५०० कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा दिवंगत अजितदादांनी दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात केली होती. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत १ हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट बँकेने ठेवले आहे. ही योजना ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. यामुळे ऊस उत्पादनामध्ये ४० टक्के वाढ, पाण्याची ३० टक्के बचत व रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेतीचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानाचा बारामतीमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महिला शेतकऱ्यांना अधिकृत महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक कायदा राज्य सरकारने केला आहे. अजितदादांनी नेहमीच महिला सक्षमीकरण आणि शेतकरी कल्याणाला सर्वोच्च स्थान दिले होते. त्यामुळे त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून  पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांची प्रतीकात्मक यादी प्रसिद्ध करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीला मोठी गती मिळाली आहे. या योजनेच्या पुणे जिल्ह्याच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६१ हजार ९०० पात्र शेतकऱ्यांना ५२३ कोटी २२ लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही पहिली यादी २ लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची आहे. शासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्ष कृतीत  उतरवत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची बांधिलकी सिद्ध केली आहे. कर्जाच्या ओझ्यातून मुक्त झालेले शेतकरी अधिक आत्मविश्वासाने शेती करतील असा या योजनेमागचा उद्देश आहे.बळीराजा हा केवळ अन्नदाता नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा आधारस्तंभ असतो असे सांगून शेतकरी कल्याणाची तळमळ हा वारसा पुढे नेण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँक करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले, अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची नेहमीच शासनाची भूमिका आहे. याच हेतूने ‘पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेची घोषणा केली आहे. ५६ लाख शेतकऱ्यांना ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत या योजनेत मिळणार आहे. या योजनेमुळे २ हजार कोटी रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. शासनाने नुकतीच शेतकऱ्यांना ४८ हजार कोटी रुपयांची वीजबील माफी दिली आहे. यांत्रिकीकरण, मुख्यमंत्री पाणंद रस्ते, सौरऊर्जा अशा अनेक योजना शासन राबवित आहे, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबर कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर केला पाहिजे. उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. एआय मुळे अनेक माहिती वेळेत व अचूक मिळते. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे सांगून यांत्रिकीकरणाची प्रलंबित देयके पुढील  महिना- दोन महिन्यात अदा करण्यात येतील, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.

सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले, अजित पवार कृषी समृद्धी कर्ज योजना शेतकऱ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी, शेतीला आधुनिकतेची जोड देणारी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात पात्र पाच शेतकऱ्यांना आज लाभ वितरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. राज्यात चौफेर सहकार चळवळ बळकट करण्याचा दृष्टीकोन ठेऊन शासन काम करत आहे. राज्याचे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी क्षेत्राने आधुनिक शेतीला प्राधान्य द्यावे लागेल. तरुणांनी पुढे येऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती करावी. कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान वापरण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर करावा लागेल, असेही ते म्हणाले.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, सहकार क्षेत्र विश्वासावर चालत असून सहकार चळवळीच्या माध्यमातून राज्याचा विकास करुया. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांना देखील पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २ लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ शेतीवर आधारित उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा फायदा झाला पाहिजे, असे निकष शासनाने ठरविले आहेत. एकवेळ समझोता योजनेतील शेतकऱ्यांना लाभ मिळून राहिलेली रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत दिली आहे.

दिलीप वळसे- पाटील म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एआय आधारित अजित पवार कृषी समृद्धी कर्ज योजना राबविण्यात येत आहे. साखर कारखाने अडचणीत आल्यामुळे शेतकरी अचडणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल.  शेतकऱ्यांनी काळानुरूप बदलले पाहिजे असे सांगून स्मार्ट शेतीचा पाया रचणारी ही योजना असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात श्री. दुर्गाडे यांनी या योजनेची माहिती दिली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांसाठी कृत्रीम बुद्धीमत्तेचा अचूक शेती, कीड व रोग ओळख, हवामान अंदाज आणि हवामान लवचिकता यामधील उपयोग याविषयी माहीत दिली. या योजनेंतर्गत कर्ज मर्यादा, परतफेड व व्याजदर आदी माहिती दिली.

यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी व महाराष्ट्र शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, दिलीप मोहिते, अशोक पवार, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

Leave A Reply

Your email address will not be published.