मानवी मनातील कोलाहल सक्षमपणे उलघडणारी चित्रे – मंत्री ॲड. आशिष शेलार

0 2


मुंबई, दि. २३: मानवी मनातील भावभावना, अंतर्मनातील गोंधळ आणि विचारांचा कोलाहल चित्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणारे चित्रकार चंद्रगुप्त इंद्रजीत भालेराव यांच्या पहिल्या ‘कोलाहल’ या चित्रप्रदर्शनाला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी भेट देऊन कलाकृतींची पाहणी केली.

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनातील कलाकृती अत्यंत वेगळ्या धाटणीच्या असून, मानवी मनातील गुंतागुंत आणि अंतर्गत संघर्ष यांचा कलात्मक वेध घेणाऱ्या आहेत.

प्रत्येक चित्राकडे पाहताना एक नवा विचार, नवी अनुभूती आणि कलेचा वेगळा पैलू उलगडत जातो, अशी भावना मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केली.

या वेळी शेतकरी आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव आपल्या कवितेतून अत्यंत नेमकेपणाने मांडणारे ख्यातकीर्त कवी इंद्रजीत भालेराव यांच्याशीही शेलार यांनी संवाद साधला. साहित्य आणि चित्रकलेच्या माध्यमातून समाजमनातील विविध पैलू अभिव्यक्त होत असल्याचे यावेळी चर्चेतून अधोरेखित झाले.

‘कोलाहल’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून चंद्रगुप्त भालेराव यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र आणि संवेदनशील वाटचालीची सुरुवात केली असून, त्यांच्या कलाकृती रसिकांना विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या ठरत आहेत.

०००

Leave A Reply

Your email address will not be published.