उन्नत नाशिक अभियानांतर्गत ब्रह्मगिरी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण

नाशिक, दि. २४ ऑगस्ट (जिमाका) : ‘हरित ब्रह्मगिरी’, ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कुभमेळा मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथील गंगा गोदावरी द्वार परिसर, मेटघर ग्रामपंचायत, ब्रह्मगिरी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, अभिनेता चिन्मय उदगीरकर, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, राजेश पंडित आदी उपस्थित होते. मिशन ग्रीन मॉन्सून मोहिमेंतर्गत आज नवव्या टप्प्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. या मोहिमेत देशी जातीच्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. आतापर्यंत ५० हजार २७५ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या अभियानासह विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचे सहकार्य लाभत आहे.
पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसर वृक्षराजीने आच्छादित होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपण केले जात आहे. या उपक्रमास नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनासाठी पुढे यावे. आगामी काळातही हे अभियान सुरू राहणार असल्याचे पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी, मेटघर ग्रामस्थ, नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००
