“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती” – मंत्री दत्तात्रय भरणे

0 1


नवी दिल्ली दि. २५ : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कार्यप्रणालीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर प्रदान करण्यात आलेला पुरस्कार हा राज्यातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजका आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची पावती आहे. या सन्मानामुळे कृषीमालाचे अधिकाधिक मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण रोजगाराला बळ देण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कार्यप्रणालीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिरागजी पासवान यांच्याहस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी संचालक विनयकुमार आवटे व पीएमएफएमईचे स्टेट लीड मॅनेजर अमोल चिद्रावर उपस्थित होते.

पीएमएफएमई अंतर्गत महाराष्ट्रात ३१ हजार ९५६ मंजूर प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्यापैकी महिला लाभार्थी प्रकल्पांची संख्या १७ हजार ९४१ म्हणजे एकूण प्रकल्पांच्या ५६ टक्के एवढी आहे.  वैयक्तिक, ५२२ समूह आणि ७५ सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत अनुक्रमे सुमारे २,८९३ कोटी रुपये, ३६ कोटी रुपये आणि २१६ कोटी रुपये आहे. याशिवाय २५,००७ वैयक्तिक, ३८८ समूह आणि २५ सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. अनुदान वितरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच ४७ हजार ५४४ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ही कामगिरीही देशात सर्वाधिक आहे.

‘बीज भांडवल’ अंतर्गत स्वयं सहायता समूहांच्या ६१ हजार ३२३ सदस्यांना २२१.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतमालाला प्रक्रिया, मूल्यवर्धन, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठेशी जोडण्यास चालना मिळत आहे. या प्रकल्पांमधून २.६४ लाख प्रत्यक्ष रोजगार आणि ७.९२ लाख मनुष्य दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. तसेच १७.७९ लाख मेट्रिक टन प्रक्रिया क्षमता निर्माण होत असून, ४७ हजार ६८६ मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. मंजूर प्रकल्पांची एकूण किंमत ३ हजार १५५ कोटी रुपये असून, पीएमएफएमई अंतर्गत ७१५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांचा समावेश असल्याचेही कृषीमंत्री  भरणे यांनी सांगितले. हा पुरस्कार केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले.

“पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नवउद्योजकांना मोठी उभारी मिळाली असून, ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योग, रोजगारनिर्मिती आणि शेतमालाच्या मूल्यवर्धनाला चालना मिळाली आहे. या योजनेमुळे शेतकरी, महिला, युवा आणि उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होत असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत आहे. भविष्यातही या योजनेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला अधिक गतिमान आणि सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील,” असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी आणि अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

ग्रामीण आणि शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांच्या श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. राज्य ग्रामीण उपजीविका अभियानासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील आणि अश्विनी अकुसकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तर राज्य शहरी उपजीविका अभियानाचा पुरस्कार सहआयुक्त नूतन खाडे आणि राज्य अभियान व्यवस्थापक प्रसाद राजेभोसले यांनी स्वीकारला.

महाराष्ट्राला मिळालेला हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान कृषिमंत्री, राज्यमंत्री (कृषी), कृषी विभागाचे सचिव आणि कृषी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीचे फलित आहे. या यशामध्ये कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी ते कृषी संचालक, जिल्हा संसाधन व्यक्ती, क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, बँका तसेच जिल्हाधिकारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा संसाधन व्यक्तींनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) आणि महाराष्ट्र राज्य शहरी आजीविका अभियान (एसयूएलएम) यांनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

0000

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.