आदिवासी विद्यार्थ्यांना ॲनिमियापासून मुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम

0 0


आदिवासी विद्यार्थ्यांना ॲनिमियापासून मुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम

मुंबई, दि. २५ : आदिवासी विद्यार्थ्यांमधील ॲनिमिया (रक्तक्षय) समस्येचे प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘ॲनिमिया निवारण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दीड महिन्यात राज्यातील २०३ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

ॲनिमिया निवारण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (सीएसीआर) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन पातळी तपासण्यात येत आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३७ हजार ९१९ विद्यार्थी आणि ४१ हजार ७०५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

यामध्ये १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५ हजार ८६८, ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२ हजार ४२० तसेच ६ एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील १ हजार ३३६ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.

नाशिक विभागात १०४ शाळांमधील ४१ हजार ४६९ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ८० शासकीय आश्रमशाळांतील ३१ हजार ३९३, २१ अनुदानित आश्रमशाळांतील ९ हजार २२७ आणि ३ एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ठाणे विभागात ८१ शाळांमधील ३३ हजार ४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांतील २२ हजार ५४, १९ अनुदानित आश्रमशाळांतील १० हजार ८८५ आणि ३ एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अमरावती विभागात ८ शासकीय आश्रमशाळांमधील १ हजार ८८५ आणि ३ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार १३ विद्यार्थ्यांची, तर नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार २९५ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले आहे, अशा विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विभागनिहाय तपासणी झालेली विद्यार्थी संख्या

नाशिक – ४१,४६९

ठाणे – ३३,४२६

अमरावती – २,८९८

नागपूर – १,८३१

“आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण याला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ॲनिमिया निवारण कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाची समस्या लक्षात घेऊन व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अवघ्या दीड महिन्यात ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचार व पोषणात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.” अशी माहिती आदिवासी विकास विभाग आयुक्त लीना बनसोड यांनी दिली.

0000

अश्विनी पुजारी/विसंअ

 

Leave A Reply

Your email address will not be published.