भगिनींचे प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वाद हीच माझी ताकद- पालकमंत्री जयकुमार रावल

0 2


धुळे, दि. २७: भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. भगिनींनी आजवर दिलेले प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वाद हीच आपली खरी ताकद असून, हा स्नेहबंध सदैव जपण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

पालकमंत्री श्री. रावल यांनी म्हटले आहे की, रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी, विश्वास आणि परस्परांच्या सुख-दुःखात कायम सोबत राहण्याच्या भावनेचा उत्सव आहे. या पवित्र दिनानिमित्त माझ्या सर्व लाडक्या भगिनींना रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो.

राज्यातील महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून भगिनींना केवळ रक्षाबंधनाच्या दिवशीच नव्हे, तर वर्षातील बारा महिने त्यांच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्याच्या रूपाने शासनाच्या आपुलकीची भेट मिळत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांमध्ये ही योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी संदेशात नमूद केले.

“माझ्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील प्रत्येक प्रसंगी भगिनींचे प्रेम, पाठिंबा, सदिच्छा आणि आशीर्वाद मला सातत्याने मिळाले आहेत. वेळोवेळी भगिनींनी मोठ्या आत्मीयतेने ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, जयकुमार भाऊ’ अशा घोषणा देत माझ्यावर प्रेम व्यक्त केले. हा जिव्हाळा आणि विश्वास माझ्यासाठी अनमोल आहे. त्याबद्दल मी सर्व भगिनींचे मनःपूर्वक आभार मानतो,” असे पालकमंत्री श्री. रावल यांनी म्हटले आहे.

रक्षाबंधनाचा हा मंगलमय सण प्रत्येक भगिनीच्या जीवनात आनंद, समाधान आणि सुरक्षिततेची भावना घेऊन येवो. प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो. सर्व भगिनी निरोगी, आनंदी आणि सुखरूप राहोत. त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव मिळत राहोत, अशी मनापासून प्रार्थना असल्याचे श्री. रावल यांनी सांगितले.

“माझ्या सर्व लाडक्या भगिनींना आणि त्यांच्या परिवाराला रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहोत,” अशा शब्दांत पालकमंत्री श्री. रावल यांनी शुभेच्छा दिल्या.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय खानदेश!

०००००

Leave A Reply

Your email address will not be published.