नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागातून ६९ नागरिक ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत पोहोचणार

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रातील ६९ नागरिकांनी काल सायंकाळी उशिरा कोदारी इमिग्रेशन केंद्रावरून चीनची सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. प्राप्त माहितीनुसार संबंधित नागरिक सोमवार, ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत. आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या ४०४ नागरिकांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे (एसइओसी) नोंद झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील २६२ पर्यटक अजूनही नेपाळ किंवा चीनमध्ये होते. यापैकी ६९ नागरिकांना सुखरूप परत आणण्यात यश आले आहे. यापूर्वी १४२ नागरिक मायदेशी परत आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सक्रिय पाठपुरावा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे अचूक मार्गदर्शन यामुळे एसइओसीद्वारे सुविधा व मदतीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत.
नेपाळमधील महापुराच्या आपत्तीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या (एमईए) नियंत्रण कक्षाशी समन्वय साधण्यात येत आहे. तसेच, चीन, तिबेट आणि नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागात गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संबंधित यंत्रणांना पाठविण्यात येत आहे. या आधारे पूरग्रस्त भागात बचाव पथके तैनात करून शोध सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि संचालक भालचंद्र चव्हाण कार्यवाहीवर लक्ष ठेवून आहेत.
अडकलेल्या नागरिकांच्या माहितीची जिल्हा यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने पडताळणी करण्यात येत आहे. तसेच, ट्रॅव्हल एजन्सी आणि संबंधित कुटुंबीयांशी सातत्याने समन्वय साधून आवश्यक माहिती संकलित केली जात आहे. नागरिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी हेल्पलाइनद्वारे प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यरत आहे. एकात्मिक नियंत्रण कक्ष, आपत्कालीन प्रतिसाद नियंत्रण कक्ष (नवी दिल्ली), परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा (एमईए) नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र सदन (नवी दिल्ली) यांना अडकलेल्या नागरिकांची अद्ययावत माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
माहिती संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित करण्यात आली असून, ती सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आली आहे. या लिंकच्या माध्यमातून नागरिक व पर्यटकांची माहिती एसईओसीमार्फत संकलित केली जात आहे. तसेच, याबाबत माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्यात आली आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून ट्रॅव्हल एजन्सी आणि संबंधित कुटुंबीयांशी २४×७ सातत्याने समन्वय साधण्यात येत आहे. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देत त्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी एसईओसी कार्यरत आहे.
मदतीसाठी १०७० हा संपर्क क्रमांक उपलब्ध आहे.
00000
