राज्य शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत करण्यात येईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

0 2


बारामती, दि. ६ : तालुक्यात शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसामुळे काऱ्हाटी परिसरात केळी पिकाचे नुकसान झाले, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रत्यक्ष केळी पीक क्षेत्रावर जाऊन झालेल्या नुकसानीबाबत पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून राज्यशासनाच्यावतीने लवकरात लवकर मदत करण्यात येईल, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

यावेळी उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार स्वप्नील रावडे, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके परिसरातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, बधितांना नुकसानभरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्यादृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून त्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने काम केले जात आहे. राज्य शासन संकटाच्या काळात नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असते. त्यामुळे धीर धरा, खचून जावू नका, असे श्रीमती पवार म्हणाल्या.

श्रीमती पवार यांनी मौजे माळवाडी (लोणी) येथे २ जून रोजी झालेल्या वादळात पत्र्याच्या शेड पडून मयत झालेल्या नंदाबाई जनार्धन लडकत यांच्या कुटुंबियांचे भेटून सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुटुंबियांना नुकसान भरपाई रक्कम म्हणून ४ लाख रुपये व २ शेळ्यांना ८ हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रल्हाद पांडुरंग लडकत यांना १६ हजार रुपये, बाळासाहेब अमृता लडकत यांना  ८ हजार रुपये आणि नंदा प्रताप फरांदे यांना १२ हजार रुपयांचा नुकसान भरपाईबाबतचा धनादेश सुपूर्द करण्यात आले.

मौजे गुणवडी येथील राधा रवीन आगवणे यांचे घराचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले आहेत, मौजे काऱ्हाटी येथे नारायण लोणकर यांच्या शेतात सुमारे संख्या २५० ते ३०० केळी पिकाचे नुकसान झाले आहे. मौजे मोडवे येथील गुलाब मोटे यांच्या १० शेळ्या, तिन मेंढ्या व १ कुत्रा वीज पडून मयत झालेले आहेत. तालुक्यातील ४ गावात १६९ शेतकऱ्यांचे ९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

कृषी मंत्र्यांकडूनही काटेवाडी परिसरात पिकांची पाहणी

तत्पूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काटेवाडी परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. अधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली.

०००

Leave A Reply

Your email address will not be published.