तांदुळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

0 0


मुंबई, दि. २४: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे १४ जून २०२६ रोजी पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा’मार्फत एकूण ४० लाख रुपयांची मदत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित वारसांना वितरित करण्यात आली.

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे पंढरपूर-सातारा मार्गावर पिकअप वाहन विहिरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातात इंदुबाई दशरथ बावचे (वय ६५), पूजा अमोल सातुरे (वय २३), पूजाव बालाजी बावचे (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १४), संस्कृती संदीप बावचे (वय १४), भारव अमोल सातुरे (वय ८) आणि समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आली.

०००

Leave A Reply

Your email address will not be published.