सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील निस्वार्थ नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १८: महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे निस्वार्थ नेतृत्व हरपले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. सप्तर्षी समाजाला दिशा देणारे विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी चळवळीचे प्रेरणास्थान होते. ग्रामीण परिवर्तन, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि तरुणांच्या मनात परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित करण्याचे मोठे कार्य केले. समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना त्यांनी नेहमीच सत्य, अहिंसा आणि लोकशाही मूल्यांचा आग्रह धरला. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने असंख्य कार्यकर्त्यांना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा दिली.
डॉ. सप्तर्षी यांच्या निधनाने ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांनी उभा केलेला वैचारिक वारसा आणि संघर्षाचा मार्ग पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आम्ही डॉ . सप्तर्षी परिवारासह, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
०००
