शिक्षण, समाजसेवेसह राष्ट्रनिर्मितीला वाहिलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

0 1


मुंबई, दि.४: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल तसेच डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक  तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून आयुष्यभर कार्य केले. देशभरात शेकडो शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य उच्च शिक्षण संस्था उभारून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा दिली. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि चिरस्मरणीय आहे.

त्रिपुरा, बिहार तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक मूल्ये जपत जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. सार्वजनिक जीवनात त्यांनी साधेपणा, दूरदृष्टी आणि समाजहिताची भूमिका कायम जपली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी शिक्षणमहर्षी, समाजसेवक आणि अनुभवी सार्वजनिक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना करते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

 

००००

Leave A Reply

Your email address will not be published.