डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात मोठी हानी – उपसभापती सचिन अहिर

0 1


मुंबई, दि. ५ :  ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणसम्राट, समाजसेवक आणि दूरदृष्टी असणारे सामाजिक – राजकीय नेते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव करताना उपसभापती सचिन अहिर म्हणाले की, शिक्षण ही काळाची गरज आहे हे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी वेळेतच ओळखले होते. त्याचाच ध्यास घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि आधुनिक रुग्णालयांची स्थापना करून समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा त्यांचा ध्यास होता आणि त्यांनी उभारलेल्या संस्था या त्यांच्या कार्याची चिरंतन ओळख राहतील.

डॉ. पाटील यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, कोल्हापूर नगर परिषदेच्या सदस्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पश्चिम बंगाल, बिहार आणि त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल पदापर्यंत पोहोचला. राजकीय व सामाजिक क्षेत्रात लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आपली एक वेगळी आणि कर्तबगार ओळख निर्माण केली. भारत सरकारने त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा भावी पिढ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना, असंख्य विद्यार्थ्यांना व हितचिंतकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थना करत उपसभापती सचिन अहिर यांनी दिवंगत डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

0000

मोहिनी राणे/स.सं.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.