नेत्रदान सामाजिक चळवळ बनवूया!

नेत्रदान ही केवळ एक सामान्य वैद्यकीय प्रक्रिया नसून मानवी संवेदनेचे, त्यागाचे आणि सामाजिक जबाबदारीचे एक अत्यंत उदात्त रूप आहे. आपल्या मृत्युनंतरही आपले डोळे या जगात जिवंत राहून कोणाचे तरी आयुष्य उजळवू शकतात, ही भावनाच अत्यंत समाधान देणारी आहे. भारतात दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा’ साजरा केला जातो. या पंधरवड्याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाबद्दल असलेली भीती आणि गैरसमजांचे निरसन करणे आणि या चळवळीत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणे हा असतो. या दिनानिमित्त हा लेख…
निसर्गाने दिलेली एक अद्वितीय आणि अमूल्य देणगी म्हणजे मानवी जीवन होय. आपल्या सुंदर आणि संवेदनशील डोळ्यांमुळे या जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येतो. ऋतुचक्राचे बदलणारे विविध रंग, निसर्गाची अद्भूत जादू, सृष्टीचे विलोभनीय सौंदर्य आणि आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावरील हास्य डोळ्यांमुळेच पाहाता येते. डोळे हे केवळ एक अवयव नसून मानवी भावना व्यक्त करण्याचे आणि बाह्य जगाशी नाते जोडणारे मुख्य माध्यम आहेत. परंतु आपण सर्वजण या निसर्गदत्त प्रकाशाचा आनंद घेत असताना नशिबाच्या किंवा वैद्यकीय कारणांमुळे अंधाराच्या सावटाखाली जगत असलेलेही अनेक लोक आहेत. ज्यांच्या आयुष्यात सूर्योदय आणि रात्रीचे चांदणे या दोन्ही गोष्टी केवळ एक न अनुभवलेली संकल्पना आहेत, त्या दृष्टिहीन बांधवांच्या अंधारमय आयुष्यात आशेचा किरण पसरवण्याचा आणि त्यांना पुन्हा हे जग स्वतःच्या डोळ्यानी ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याची संधी देण्याचा सर्वोत्तम व पवित्र मार्ग म्हणजेच ‘नेत्रदान’ हा होय.
आपल्या देशात कॉर्नियल अंधत्व म्हणजेच डोळ्यातील पारदर्शक पटलाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड मोठी आहे. डोळ्यातील पारदर्शक पटलाला (कॉर्निया) कोणत्याही प्रकारची इजा झाल्यामुळे, संसर्ग झाल्यामुळे किंवा कुपोषण व जन्मापासूनच्या दोषांमुळे दृष्टी गमावलेल्या लोकांना ‘कॉर्निया प्रत्यारोपण’ या सोप्या शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी मिळवता येते. दुर्दैवाने, भारतात नेत्रदानाची गरज आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे कॉर्निया यांमध्ये एक खूप मोठी तफावत आहे. दरवर्षी देशात लाखांहून अधिक कॉर्नियाची गरज भासते, परंतु प्रत्यक्षात केवळ काही हजार नेत्रदानेच पार पडतात. या दरीमुळे हजारो दृष्टिहीन व्यक्तींना, ज्यांमध्ये लहान मुलांचा आणि तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे, आयुष्यभर अंधारात राहावे लागते किंवा वर्षांनुवर्षे दात्याच्या प्रतीक्षेत राहावे लागते. मृत्यू ही निसर्गाची अटळ घटना आहे. परंतु मृत्यूनंतर आपले हे मौल्यवान अवयव मातीत मिसळून जाण्याऐवजी किंवा अग्नीत भस्म होण्याऐवजी जर कोणाचे निरस आयुष्य प्रकाशमान करत असतील, तर त्याहून मोठे पुण्य कार्य किंवा जिवंतपणाचे लक्षण दुसरे कोणतेही असू शकत नाही.
समाजात नेत्रदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असण्यामागे वैद्यकीय सुविधांची कमतरता हे कारण नसून, जनजागृतीचा अभाव आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले गैरसमज हेच मुख्य कारण आहे. अनेक लोकांना अशी भीती वाटते की नेत्रदान केल्यामुळे मृतदेह विद्रुप दिसेल किंवा अंत्यसंस्कारास विलंब होईल. परंतु हे पूर्णपणे वास्तवविरोधी आहे. नेत्रदानाची प्रक्रिया अतिशय वैज्ञानिक, सुटसुटीत आणि सन्मानपूर्वक केली जाते. प्रशिक्षित डॉक्टरांची तज्ज्ञ टीम मृतदेहाच्या ठिकाणी येऊन अवघ्या 15 ते 20 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करते. यामध्ये डोळ्यातील केवळ आवश्यक असा कॉर्नियाचा भागच काढला जातो आणि त्या जागी कृत्रिम पटल किंवा कापूस ठेवून पापण्या अत्यंत काळजीपूर्वक बंद केल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा डाग किंवा विद्रुपपणा येत नाही. याशिवाय, पुढील जन्मात व्यक्ती अंध जन्माला येईल असा अंधश्रद्धेवर आधारित विचारही समाजातील काही घटकांमध्ये दिसून येतो. वैद्यकीय आणि अध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून हा विचार पूर्णपणे फोल आहे; उलटपक्षी, मृत्यूनंतर अवयवदान करून दुसऱ्याचे आयुष्य उजळवणे हा सर्वात मोठा धर्म मानला गेला आहे.
नेत्रदान ही अत्यंत संवेदनशील आणि वेळेवर आधारित असलेली प्रक्रिया आहे, म्हणूनच यामध्ये वेळेचे नियोजन सर्वात महत्त्वाचे ठरते. व्यक्तीच्या मृत्युनंतर साधारणपणे चार ते सहा तासांच्या आत नेत्रदान होणे अनिवार्य असते. जितक्या लवकर कॉर्निया काढला जाईल, तितकी त्याची गुणवत्ता उत्तम राहते आणि शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढते. मृत्युनंतर नातेवाईकांनी तत्काळ जवळची नेत्र पेढी किंवा रुग्णालयाशी संपर्क साधणे आवश्यक असते. डॉक्टर येईपर्यंत मृत व्यक्तीचे डोळे उघडे राहू नयेत म्हणून त्यावर ओल्या कापसाच्या पट्ट्या ठेवाव्यात, पंखा बंद ठेवावा आणि डोक्याखाली उशी ठेवून डोके थोडे उंच ठेवावे, जेणेकरून डोळ्यांमधील रक्तप्रवाह नियंत्रित राहतो.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नेत्रदानाचा संकल्प केला असो वा नसो, मृत्युनंतर त्याच्या निकटवर्तीयांची संमती ही कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या अनिवार्य असते. अनेकदा व्यक्ती हयातीत फॉर्म भरते, परंतु मृत्यूच्या वेळी कुटुंबातील सदस्यांना याबद्दल माहिती नसल्यामुळे किंवा ऐनवेळी घेतलेल्या भावनावश निर्णयामुळे नेत्रदान राहून जाते. म्हणूनच, जर आपण नेत्रदानाचा संकल्प करत असू, तर त्याची स्पष्ट कल्पना आपल्या कुटुंबातील सदस्यांना देणे आणि त्यांना या निर्णयामध्ये सहभागी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
शेवटी, नेत्रदान ही केवळ काही डॉक्टरांची किंवा शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून ती एक व्यापक सामाजिक चळवळ बनली पाहिजे. आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, जसे की वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस किंवा प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नेत्रदानाचा संकल्प करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवू शकतो. रक्तदान हे जसे श्रेष्ठदान मानले जाते, तसेच नेत्रदान हे महादान आहे. आपण या जगात नसतानाही आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून हे जग पाहू शकतो आणि कोणाच्या तरी अंधारमय विश्वात कायमचा प्रकाश पसरवू शकतो. नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊ या, अंधश्रद्धा व गैरसमज बाजूला सारूया, नेत्रदानाचा संकल्प करू या आणि इतरांनाही या महान कार्यासाठी प्रेरित करू या.
अतुल पांडे,
सहायक संचालक (माहिती)
0000
