वेगवान विकासाचे चेंज मेकर्स बना फक्त मुंबई नव्हे, संपूर्ण राज्य ग्रोथ इंजिन बनविणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 0


मुंबई दि २५: जगभर झपाट्याने विकास होत असून आपणही देश आणि राज्याच्या गतिशील विकासाचे चेंज मेकर्स बना असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्याला देशाचे ग्रोथ इंजिन बनविण्यासाठी सरकारने पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले. इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस कॉनक्लेव्ह अँड अवॉर्ड्स २०२६ मध्ये ते बोलत होते. महाराष्ट्राची विकासाची वाटचाल ही केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून ती आधुनिक, शाश्वत, जागतिक स्पर्धेत सक्षम आणि सर्वसामान्यांसाठी अनुकूल असावी, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

विकास आणि पर्यावरणाचा समतोल

महाराष्ट्रासारख्या मोठ्या किनारपट्टीचा, विविध भौगोलिक परिस्थितीचा आणि वेगाने विकसित होणाऱ्या राज्यासाठी हवामान बदलाचे आव्हान गंभीर आहे. त्यामुळे विकासाचे नियोजन करताना पर्यावरण आणि हवामान बदलाचा विचार केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या हवामान कृती आराखड्यातही शाश्वत विकासासाठी अनुकूलन आणि उत्सर्जन कमी करण्याच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

मुंबईसारख्या किनारी शहरात वाढती उष्णता, पूर, समुद्रपातळीतील वाढ आणि प्रदूषण यांसारख्या आव्हानांना सामोरे जाताना फ्लड कंट्रोल, कोस्टल प्रोटेक्शन, हरित क्षेत्र वाढविणे, रेनवॉटर मॅनेजमेंट, शाश्वत वाहतूक आणि तंत्रज्ञानाधारित नियोजनावर भर दिला जात आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

पायाभूत सुविधा विकासाला वेग

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मजबूत पायाभूत सुविधांची जोड देण्याचे काम सुरू आहे. मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, एक्स्प्रेसवे, विमानतळ, बंदरे आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा यांचा उद्देश केवळ रस्ते आणि इमारती उभारणे नसून उद्योगांना चालना देणे, नागरिकांची प्रवासक्षमता वाढवणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा आहे. राज्याच्या अमृतकाल रस्ते विकास योजनेतही सर्वसमावेशक, शाश्वत आणि भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन रस्ते विकासाचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबई-एमएमआरमध्ये मेट्रो, कोस्टल कनेक्टिव्हिटी, अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-३, वाढवण बंदर आदी गेमचेंजर प्रकल्प वेगाने पुढे जात आहेत. एमएमआरमध्ये ३३७ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क विकसित होत असून, रेल्वे, रस्ता, मेट्रो आणि जलवाहतुकीचे मल्टिमोडल इंटिग्रेशन करण्यावर भर आहे अशी माहिती त्यांनी दिली

मुंबईपुरता विकास नाहीसंपूर्ण महाराष्ट्र ग्रोथ इंजिन

महाराष्ट्र केवळ मुंबई-केंद्रित विकास न करता नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई तसेच विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडत आहे. टियर-२ आणि टियर-३ शहरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून ते स्वयंपूर्ण आर्थिक केंद्रे बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे सांगून उप मुख्यमंत्री म्हणाले की, इंडस्ट्रियल पार्क, आयटी झोन, लॉजिस्टिक्स हब, मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि रोजगार क्लस्टर्सच्या माध्यमातून या शहरांमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. महाराष्ट्राला देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचे उद्दिष्ट आहे

मुंबई-एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र

मुंबई आणि एमएमआरच्या विकासासाठी व्यापक रोडमॅप तयार करण्यात आला असून, मुंबईचा जीडीपी दुप्पट करून तिला जागतिक आर्थिक केंद्र बनविण्याच्या दिशेने काम सुरू आहे. एमएमआरमध्ये सुमारे ४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत. या प्रदेशात सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी  सांगितले. एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहकार्यामुळे मुंबईला जागतिक फिनटेक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे असेही ते म्हणाले

परवडणारी घरे आणि झोपडपट्टीमुक्त मुंबई

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विकासाचा खरा अर्थ सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा होणे हा आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांसोबत परवडणाऱ्या घरांनाही सरकारने प्राधान्य दिले आहे. मुंबई आणि एमएमआरमधील घरांची वाढती गरज लक्षात घेऊन नवीन गृहनिर्माण धोरण लागू करण्यात आले असून, २०३० पर्यंत ईडब्ल्यूएस आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ३५ लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्यात येत आहे. झोपडपट्टी पुनर्विकासासोबतच नव्या झोपडपट्ट्या निर्माण होऊ नयेत यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

गुंतवणूकदारांना महाराष्ट्राचे खुले निमंत्रण

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, राज्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तरुणांना संधीच्या शोधात राज्याबाहेर जावे लागू नये, यासाठी राज्यातच उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत. विकसित महाराष्ट्राशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्यांसाठी आधुनिक, शाश्वत, जागतिक स्पर्धेत सक्षम आणि सर्वसामान्यांसाठी अनुकूल महाराष्ट्र घडविणे हेच आमचे ध्येय आहे,असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

0000

 

Leave A Reply

Your email address will not be published.